Close

कार चालकच चाहता निघाला आणि सुव्रतकडे व्यक्त केली भन्नाट इच्छा, अभिनेत्याची पोस्ट चर्चेत ( Suvrat Joshi Share Post About His Fan)

काल वरवरचे वधू वर या आमच्या नाटकाचा श्री शिवाजी मंदिर येथे प्रयोग होता. गणेशोत्सवामुळे दादर भागात गर्दी असणार हे अपेक्षित होतं म्हणून कॅब ने जायचा विचार केला. Uber ला हे फोटोत दिसणारे सचिन भाऊ चालक म्हणून आले. त्यांनी बसल्या बसल्या माझ्याकडे बघून स्तिमित झाले आणि एक छान छान सुहास्य देऊन otp विचारला. मग काही वेळाने सभ्यपणे त्यांनी मला ओळखल्याचे आणि त्यांना माझे काम आवडत असल्याचे सांगितले. पण मग लगेचच त्यांनी तुमचे नवे नाटक “वरवरचे वधू वर” पाहायचे आहे अशी इच्छा व्यक्त केली.

हे ऐकून मात्र मी हरखून गेलो. नाटकाचा शुभारंभ झाल्यापासून ते आणि त्यांची पत्नी नाटकाला येण्यासाठी सोयीस्कर दिवस शोधत आहेत. दोघेही काम करतात आणि त्यांची कन्या अगदी लहान असल्याने अजून जमले नाही. मग मात्र मी त्यांना आग्रह धरला की चला आताच प्रयोगाला बसा. त्यांच्या पत्नीला त्यांनी विडियो कॉल लावला. साधेसे घर आणि निगुतीने सजवलेला बाप्पा पार्श्वभूमीवर होते. मी त्यांनाही आमंत्रण केले. पण घरी बाप्पा आणि मुलगी असल्याने आज जमत नसल्याचे वहिंनिनी सांगितले. त्यांच्या घरातील बाप्पाचे आणि चिमुकलीचे दर्शनही व्हिडिओ कॉल वर झाले.

सचिन भाऊ तुम्ही तुमच्या सोयीने प्रयोगाला यालच, पण हा प्रसंग मला कलाकार म्हणून खूप काही देऊन गेला. मराठी नाटक हे प्रत्येक व्यवसायातील,विविध पार्श्वभूमी असलेल्या मराठी माणसाला पहावेसे वाटते ही फार दुर्मिळ आणि महत्त्वाची गोष्ट आहे. मध्यंतरी आमच्या एका प्रयोगाला एका फार मोठ्या पदावरचे सचिव गुपचूप तिकिट काढून नाटक बघून गेले आणि आता सचिन भाऊ पण येतील. मी जगभर नाटकाचे प्रयोग पाहिले. मी हिंदी नाटकाचे प्रयोग पृथ्वी थिएटर,NCPA आणि भारतभर केले. पण विशिष्ट कलाव्यवहार हा विशिष्ट वर्गापर्यंत मर्यादीत राहतो असाच माझा अनुभव. फक्त शेकस्पियर काळात कष्टकरी ते जमीनदार globe थिएटर मध्ये नाटक बघायला एकत्र यायचे.

मराठी नाटक हे त्या कुळातील पण त्याचेच जिवंत,प्रवाही प्रारूप आहे की काय असे वाटून गेले. अर्थात याचे संपूर्ण श्रेय इथे होऊन गेलेल्या आमच्या दिग्गजांना आहे. आणि आताही भरत जाधव सर,प्रशांत दामले सर तर प्रायोगिक रंगभूमीवर अतुल पेठे सर यांसारख्या अनुभवी कलाकारांना आहे. त्यांचे नाटक हे भौगोलिक, सांस्कृतीक आणि आर्थिक स्तर चिरून जायचा प्रयत्न सतत करत असते. यातून जबाबदारीची जाणीव खूप वाढली. प्रत्येक माणूस नाटक बघायला येतो तेव्हा तो त्याच्या कष्टाची कमाई आपल्या प्रति खर्च करत असतो. त्यामुळे आपले सगळे बाजूला सारून त्याला एक उत्तम प्रयोग नाही देऊ शकलो तर तो नैतिक अपराध असेल असेच वाटून गेले.

नाट्यशास्त्र म्हणते की नाटक हे डोळे आणि कानांनी करायचा यज्ञ आहे. मी पुढे जाऊन म्हणेन की आम्ही नटानी तर सर्व इंद्रिये या आहुतीमध्ये ओतली पाहिजेत. आमचे पडद्यामागचे कलाकार त्यांच्या घामाचे धृत यात टाकतात. तसेच प्रेक्षकही यात आपल्या वेळेचे,मनाचे ,इंद्रियांचे अर्घ्य देत असतो. यातून पेटलेला हा नाट्ययज्ञ हा हिवाळी रात्री पेटवलेल्या शेकोटीप्रमाणे सर्व रसिकांना ऊब देत राहो अशी सदिच्छा.

Share this article