Close

कामजीवनात नका करू अशा चुका (Don’t Make Such Mistakes In Your Sex Life)

कामजीवन व्यवस्थित राखायचं तर मनानं आणि शरीरानं कायम चिरतरुण राहायला हवं. नातेसंबंधातील प्रेम आणि उत्साह टिकवून ठेवण्यासाठी थोडंसं स्वतःलाही बदलायला हवं ना. अशा काही चुका सावरून घेण्यासाठी काय उपाय करावेत जाणून घ्या.


सहजीवनात आणि कामजीवनात आपल्या पतीराजाची मर्जी राखण्याकडे बव्हंशी स्त्रियांचा कल दिसून येतो. कारण पतीदेव खूूश तर गृहदेवता खूष, अन् दोघे खूष तर संसारसुख खूप. असा सर्वसाधारण अनुभव आहे. या सूत्रानुसार तुम्ही आपल्या ‘त्यांच्या’ खुषीकडे जरूरीपेक्षा जास्त लक्ष पुरविता आणि मग तुमच्या हातून चुका घडतात. घरकामातच नव्हे कामसुख देण्याबाबतही नकळत चुका घडतात नि दोघांचाही विरस होतो. सर्वसाधारणपणे या चुका कोणत्या आणि त्या कशा निस्तराव्यात यासाठी हे हितगुज.
जे लोक प्रेमविवाह करणार असतात, ते किंवा ज्यांचं लग्न घरच्यांनी ठरविलं असतं ते, लग्नाआधी प्रेमदिवाणे होऊन एकत्र फिरत असतात. सिनेमा, हॉटेलिंग, शॉपिंग एन्जॉय करत असतात.
या भेटीसाठी ती आणि तो फारच आतुर असतात. (यातील ‘ती’ म्हणजे तुम्हीच बरं!) अन् ‘ती’ तर स्वतःला इतकी सजवत असते की, घरातली माणसं ‘निघ एकदाची, उशीर होईल’, म्हणत तिला वारंवार बजावत असतात. पण…
एकदा का लग्न झालं की, तिचं नटणं मुरडणं लोप पावतं. छान कपडे, स्टाइल, मेकअप, परफ्युम वापरण्याचा उत्साह काहीसा कमी होतो. ‘आता काय करायचंय्, नटून? लग्न तर झालंय!’ अशी (चुकीची) समजूत करून तिचं स्वतःकडे दुर्लक्ष होतं. कपड्यांची आवडनिवड बदलते. मेकअप करायला, स्टाइल मारायला वेळ नसतो.

कामेच्छा मंदावते
नोकरी करणार्‍या मुलींच्या बाबतीत ते खरंही असतं अन् ज्या नोकरी करत नाहीत, त्यांना घरकामातून, नवर्‍याची उठबस करण्यातून उसंत मिळत नाही. अगदीच कुठे लग्नकार्याला किंवा सणासमारंभाला जायचं तर नीटनेटके कपडे आणि मेकअपचं सामान बाहेर निघतं. थोडक्यात सांगायचं तर पूर्वी
स्वतःचं व्यक्तिमत्व आकर्षक दिसावं म्हणून सांभाळणारी ‘ती’ आता गबाळी दिसू लागते. नवरे उघडपणे बोलले नाही, तरी अशा अरसिक बायकोबद्दल त्याच्या मनातील शरीराचे आकर्षण ओसरते.
‘घर की मुर्गी दाल बराबर,’ असं तो आपल्या मित्रपरिवारात बोलू लागतो. आपण अजागळ राहिलो म्हणजे आपल्याही मनातील कामेच्छा मंदावते आणि जोडीदारालाही शारीरिक आकर्षण तेवढेसे राहत नाही… लग्नानंतरच्या पहिल्या दिवसातील कामसुखाची गोडी, शरीरसुखाचा आवेग कमी होतो.
हे सगळं चुकीचं घडत असतं. या चुका टाळल्या पाहिजेत. त्यासाठी लग्न झालं, म्हणजे आता देवपुजेला लागलो, ही
भावना मनातून काढून टाकली पाहजे. कामजीवन समाधानकारक असले, तर संसार सुरळीत चालतो, हे लक्षात ठेवले पाहिजे. सेक्ससंबंध हा शरीरधर्म आहे, तो व्यवस्थित पाळला गेला पाहिजे, ही दोघांचीही भावना असली पाहिजे. परस्परांमध्ये शारीरिक आकर्षण टिकून राहिले तर मनंही जुळलेली राहतात. हे आकर्षण टिकवून ठेवण्यासाठी सर्वप्रथम मनातील अजागळता काढून टाका.

नवर्‍याचे उत्तेजन हवे
आपला देह सुडौल राहिला नसेल तरी सुव्यवस्थित आणि देखणा राहिला पाहिजे, हे मनापासून ठरवा. उत्साह ओसरू देऊ नका. आपलं व्यक्तिमत्त्व आपल्यासाठी, आपल्या सहचरासाठी आणि चारचौघात वावरण्यासाठी आकर्षकच दिसले पाहिजे, असा निग्रह करा. तिनं आकर्षक दिसावं म्हणून नवर्‍यानेही तिला उत्तेजन दिले पाहिजे. दिसू दे कशीही, असं म्हणून त्यानंही दुर्लक्ष करता कामा नये. नवर्‍यानंच आपल्या बायकोचं कौतुक केलं नाही तर चांगलं दिसून काय करायचं आहे,
असं तिला वाटणारच. त्यामुळे चांगले कपडे आणि चांगलं सजणं याबरोबरच शारीरिक स्वच्छता नीट ठेऊन कामजीवन छानपैकी उपभोगलं पाहिजे.
लग्न तर झालं, आता कोणासाठी सजायचं, या (अगदी चुकीच्या) मानसिकतेबरोबरच आणखी एक चूक वैवाहिक जीवनात तिच्या हातून घडते. मूलबाळ झालं की आता बसं झाले
ते शरीरसंबंध, अशी अटकळ बर्‍याच स्त्रियांची असते. आता फक्त बाळाकडे लक्ष द्यायचं, स्वतःचं दिसणं वागणं आणि नवर्‍याकडे दुर्लक्ष करायचं, अशी अकारण भावना अशा काही स्त्रियांच्या मनात निर्माण होते. मातृत्त्व हे स्त्रीच्या जीवनातील परमोच्च वरदान असलं तरी त्यासाठी देहधर्म सोडावा, आपल्या जोडीदारालाही शरीरसुखाबाबत भावना माराव्या लावाव्या, अशी भूमिका असता कामा नये.

खूणगाठ बांधा
आपल्या कुशीतून जन्मलेल्या बाळाचं संगोपन हे वैवाहिक स्त्रीचं प्राधान्य असतं हे मान्य. पण आपल्या जोडीदाराचे आपल्या बाबतीत आकर्षण ओसरू नये, हेही तिनं बघितलं पाहिजे. त्यासाठी बाळंतपणानंतर शरीर सुटू नये म्हणून खबरदारी घेतली पाहिजे. योग्य ते व्यायाम घेऊन आपला बांधा सुडौल राखला पाहिजे. सजण्याचा, नवर्‍याला आकर्षित करण्याचा उत्साह कमी झाला नाही पाहिजे, ही काळजी घ्यायलाच हवी. माता आणि मादी यांचा समतोल राखून सुखाची देवाणघेवाण केली पाहिजे. आपण ठरविलं तर कोणत्याही वयात, कोणत्याही वेळी सेक्सी दिसू शकतोे, ही खूणगाठ मनाशी बांधा, म्हणजे तुमच्या देहबोलीत आपोआप फरक पडेल.
आई झालेल्या बाईनं ज्या चुका करू नयेत, अशी अपेक्षा असताना तिच्या नवरोबानं देखील काही चुका करता कामा नयेत. बाळंतपणानंतर तिचे प्रकृतीस्वास्थ्य नरमगरमच असते. तिची मानसिक व शारीरिक स्थिती शरीरसुखासाठी पोषक नसते. तिच्या रूपरंगात बदल झालेला असतो. तेव्हा ती लगोलग पूर्वीसारखीच कामातुर असेल, अशी अपेक्षा नवर्‍यानं ठेवणं चुकीचं आहे. बाळाच्या संगोपनाकडे प्राधान्य देणारं तिचं मन, नवर्‍याची काळजी घ्यायला, उशीराने ताळ्यावर येतं. हे समजून घेत तिचं मन व शरीर पूर्वपदावर येण्यासाठी नवर्‍यानं तिची चांगलीच काळजी घेतली पाहिजे. आपलं शरीर मीलन लवकरच होईल नि आपण पुन्हा नव्याने सुरुवात करून सेक्ससुख घेऊ, अशी रसिकता दर्शविणारे बोल तिला सुनावले पाहिजेत. बाळंतपणानंतर हिचं शरीर सुटलं, चार्म गेला ही मानसिकता बदलून मला तुझं अजूनही आकर्षण आहे, हा दिलासा दिला पाहिजे.

Share this article