२१ व्या शतकात प्रत्येक ठिकाणी महिला ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत आहे. प्रत्येक क्षेत्रात अगदी जोमाने काम करताना दिसून येत आहे. गृहिणी किंवा वर्किंग वूमन हिला कधीच कामांची कमतरता नसते. घराचं, ऑफिसचं, स्वयंपाकाचं एक ना दोन.. कधीही पाहा कामं आ वासून पडलेली असतातच. पण आपल्या कामांवर आपणंच नियंत्रण आणायला हवं. नाहीतर सगळाच गोंधळ होऊन कामंही होत नाहीत आणि त्रास होतो तो निराळाच.. ऑफिस आणि घर या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडता पाडता पूर्णपणे अडकून जाते मात्र तिची तारेवरची कसरत काही थांबायचं नाव घेत नाही.
दिल धडकने दो सिनेमातला एक संवाद आहे. त्यात आयेशा मेहरा या नायिकेचा नवरा असलेला मानव म्हणतो, आजवर आमच्या घराण्यात कुणी बाहेर जाऊन काम केलं नाही; पण मी आयेशाला बिझनेस सांभाळण्याची परवानगी दिली! तो म्हणतो ते बोचरं असलं तरी, आजही अनेक महिला घरून नोकरी करण्याची परवानगी असेल तरच नोकरी करू शकतात. अगदी लग्न ठरलेल्या आधुनिक मुली देखील सहज सांगतात की ‘त्यांनी’ म्हणजे सासरच्यांनी सांगितलं आहे की तू नोकरी केलीस तरी आमची काही हरकत नाही. म्हणजेच आजही तरुणीने / बाईने नोकरी करणं हे घरच्यांच्या इच्छेवर आणि परवानगीवरच बहुतांश अवलंबून असतं. तशी परवानगी नसेल तर अनेकजणी नोकरी साेडून, विशेषत: मूल झाल्यानंतर तर घरीच बसतात.
आजच्या 'आधुनिक' युगातही आपल्या समाजातील बहुसंख्य लोकांचा असा विश्वास आहे की केवळ महिलांनी घर आणि मुले सांभाळणे ठीक आहे, त्यांना काम करण्याची गरज नाही. सामाजिक दबाव आणि प्रेरणेचा अभाव यामुळे आजही आपल्या समाजात ८०% स्त्रिया हेच करत आहेत. आजही आपल्या देशात नोकरदार महिलांची लोकसंख्या नोकरदार पुरुषांच्या तुलनेत निम्म्याहून कमी आहे. परंतु ज्या महिला काम करतात त्यांना देखील अनेक आव्हानांना चांगले सामोरे जावे लागत. प्रत्येक महिलेला घरातून सांगितलं जातं, बाई!!! तू जा कामाला… आमची काही हरकत नाही… पण तुझी घरातले सर्व काम कर आणि मग जा…, मग हाच नियम पुरुषांना का लागू होत नाही?

महिला काम करते तेव्हा तिच्यावर अनेक बंधनांचा वर्षाव हा केला जातो. घरातील चूल - मूल, वेळेची मर्यादा सर्व काही सांभाळून तिला तिची नोकरी ही सांभाळावी लागते. आणि अश्यातच जॉब आणि घर दोन्ही सांभाळताना तिची मात्र चांगलीच कोंडी होते. अनेकींना कामासाठी ८-१० तास घराबाहेर रहावं लागतं. कधी कधी नाईट शिफ्ट मध्ये काम करावे लागते. अशावेळी घर आणि जॉब सांभाळताना तिला तारेवरची कसरत करावी लागते. या दोघांमध्ये समतोल राखण्याचा सतत प्रयत्न करत असते. मुलांचं संगोपन, घरातल्या आणि ऑफिसच्या जबाबदाऱ्या अशी तिहेरी जबाबदारी असते. आणि तीनही गोष्टी आपण समान कार्यक्षमतेने करायला हव्यात असं वाटतं. कुटुंबाकडून ही तशी अपेक्षा असते. मुलं अभ्यासात मागे पडली तरी स्त्रीला ऐकवले जाते की तुझं सगळं लक्ष करिअरवर आहे. मुलांकडेही थोडाफार लक्ष देत जा. त्यात स्पेशल चाईल्ड असेल तर त्या स्त्रीची फार तारांबळ उडते.
आजही महिलेला घराबाहेर पडायचे असेल तर १०० प्रश्न सहज समोर येऊन उभे रहातात. पण त्याच घरातील व्यक्ती थोडा पुढचा आणि चांगला विचार का करत नाहीत? घरातली एक मुलगी शिकली की सर्व कुटुंब हळू हळू सुशिक्षित होते असं म्हंटल जात पण घरातील एक स्त्री घराबाहेर पडून काम करू लागली तर त्याच घराला हात भर लाभेल हा विचार का केला जात नाही? घरातील प्रत्येक कामाची जबाबदारी, मुलांची जबाबदारी हि त्या घरातील महिलेची असते त्याच प्रमाणे या जबाबदाऱ्या त्या घरातील पुरुषांच्या किंवा घरातील इतर व्यक्तींच्या असतातच मग तारेवरची कसरत ही तिने एकटीनेच का बरं करावी? एकदा तरी विचार करून बघाच ….
लेखक - गायत्री घुगे - बोडके