गेल्या २६ वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत सक्रिय असलेला चित्रपट निर्माता म्हणजे करण जोहर. त्यानं आजवर अनेक अप्रतिम आणि रोमँटिक चित्रपट प्रेक्षकांना दिले आहेत, जे आजही खूप लोकप्रिय आहेत. करण जोहर आज वयाच्या पन्नाशीत दोन मुलांचा बाबा आहे. पण तरीही करण जोहर सिंगल आहे. करण जोहरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहेत.
करण जोहर आजही अविवाहित असला तरी सात वर्षांपूर्वी तो सरोगसीच्या मदतीने जुळ्या मुलांचा बाबा झाला आहे. यश आणि रुही अशी त्याच्या मुलांची नावं आहेत.
फेय डिसूझाच्या चॅट शोमध्ये संवाद साधताना निर्मात्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत भाष्य केलं आहे. वयाच्या चाळीशीत त्यालाही जोडीदाराची गरज भासत होती पण, पन्नाशी ओलांडल्यावर करणने जोडीदार शोधणं बंद केलं. यामागे अनेक कारणं असल्याचं करणने या मुलाखतीत सांगितलं.
करण जोहर सांगतो, “मी बऱ्याच वर्षांपासून सिंगल आहे. मी कोणाबरोबरही रिलेशनशिपमध्ये नाहीये. खरं सांगायचं झालं तर, माझ्या संपूर्ण आयुष्यात आतापर्यंत मी दीड वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिलो आहे. पण, आता मी सिंगल असल्याचा मला किती आनंद आहे हे मी तुमच्यासमोर शब्दांत व्यक्त करू शकत नाही. आता भविष्यात मी पुन्हा कधी रिलेशनशिपमध्ये येईन असं मला अजिबात वाटत नाही. बाथरुम, बेडरुम, माझी पर्सनल स्पेस कोणाबरोबर तरी शेअर करणं या गोष्टी मी विसरून गेलोय. माझा दिवस माझी आई अन् मुलांपासून सुरू होतो आणि त्यांच्याबरोबर वेळ घालवण्यात संपतो.”
“मी ४० वर्षांचा झाल्यावर मला जाणवायचं आयुष्यात जोडीदार हवा…पण, जेव्हा मी पन्नाशी ओलांडली त्या दिवसांपासून मला माझ्या आयुष्यात आता आणखी कोणीही नको असं वाटू लागलं. डेट करणं, देशातील किंवा देशाबाहेरच्या लोकांना जाऊन भेटणं या सगळ्या परिस्थितीतून मी गेलो आहे. सगळं काही अनुभवलं आहे. पण, इथून पुढे मला खरंच कोणी योग्य वाटलं तर ठिके… नाहीतर सध्या मला जोडीदाराची गरज अजिबात वाटत नाही.” असं स्पष्ट मत करण जोहरने मांडलं.
करणच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, धर्मा प्रोडक्शनचा ‘बॅड न्यूज’ चित्रपट येत्या १९ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये विकी कौशल व तृप्ती डिमरी यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.