Close

सुंदर त्वचा राहील सदा (Beautiful Skin Will Remain Forever)

वयानुरूप आपले आरोग्य, आहार, दिनक्रम, राहणीमान, जीवनशैली, विचार अशा सर्वच गोष्टी बदलत असतात. आणि या सर्वांचा परिणाम आपल्या त्वचेवर होत असतो. म्हणूनच त्वचेची काळजी घेतानाही वयाचा विचार नक्कीच करायला हवा.


महिन्यातून एकदा क्लिनअप किंवा फेशियल केल्यास आपण त्वचेची व्यवस्थित काळजी घेतली, असं तुम्हाला वाटत असेल, तर हा निव्वळ गैरसमज आहे. तसेच एखाद्या क्रीमच्या वापराने तुमची त्वचा चमकदार व तजेलदार वाटत असेल, तर ही चमकही काही काळापुरती असते हे लक्षात घ्यायला हवं. कोणतीही तात्पुरती ट्रिटमेंट तुम्हाला कायमचं सौंदर्य मिळवून देऊ शकत नाही, हेच खरं आहे. म्हणूनच सुंदर, नितळ आणि उजळ त्वचा हवी असल्यास, तिची योग्य काळजी, तीही नियमितपणे घेणे आवश्यक आहे. वयानुरूप आपल्या आरोग्य, आहार, जीवनशैली, विचार अशा सर्वच गोष्टी बदलत असतात. आणि या सर्वांचा परिणाम आपल्या त्वचेवर होत असतो. म्हणूनच वयानुरूप त्वचेची काळजी घेतानाही काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.
किशोरावस्था (13 ते 19 वर्षं) किशोर वयात प्रामुख्याने मुरुमांची समस्या जाणवते. याशिवाय मासिक पाळीची सुरुवात, कमी दर्जाच्या सौंदर्य प्रसाधनांचा वापर, अति मेकअप, सनबर्न यांमुळे चेहरा निस्तेज होतो. डोळ्यांखाली काळी वर्तुळं तयार होतात.
या वयात परिपूर्ण आहाराची आवश्यकता असते. त्यामुळे आहार सर्वसमावेशक असावा.
त्वचेनुसार फेस वॉश निवडा. त्वचा कोरडी व शुष्क असल्यास क्रीम बेस्ड फेस वॉश आणि तेलकट असल्यास वॉटर बेस्ड फेस वॉश वापरा. दिवसातून किमान 3-4 वेळा फेस वॉशने चेहरा स्वच्छ धुवा.
क्लिझंर व मॉश्‍चरायझरही जरूर वापरा. सर्वप्रथम चेहर्‍यावर क्रीम लावून 3 मिनिटे हलका मसाज आणि नंतर वाफ घ्या. असे केल्यास चेहरा ताजातवाना होईल.
चांगल्या दर्जाचीच सौंदर्य प्रसाधने वापरा. मेकअपही चांगल्या ब्रँडचाच वापरा आणि अधिक मेकअप करू नका.

नवतारुण्य (20 ते 30 वर्षं)
हा काळ उच्च शिक्षणाचा किंवा करिअरच्या, नोकरीच्या सुरुवातीचा असतो. त्यामुळे अर्थातच धावपळ व ताणतणाव जास्त असतो आणि तोच चेहर्‍यावर दिसूही लागतो. त्यामुळे त्वचेची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असते.
दररोज भरपूर पाणी प्या. यामुळे शरीरातील सारे टॉक्सिन्स निघून जातात. हे केवळ त्वचेसाठीच नाही, तर आरोग्यासाठीही उत्तम आहे.
रोजच्या आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. रोज एक सफरचंद खाणे तुमच्यासाठी फायदेशीर आहे.
नियमितपणे रात्री झोपण्यापूर्वी चेहर्‍याला क्लििंंजग, टोनिंग व मॉश्‍चरायझिंग करणे आवश्यक आहे. क्लिजिंगमुळे त्वचेवरील धूळ, प्रदूषण व उर्वरित मेकअप निघून जातो. टोनिंगमुळे त्वचेची छिद्रं खुली होतात आणि त्यानंतर मॉश्‍चरायझर लावल्याने त्वचेला पोषण मिळते.
कोणतंही फळ खाताना त्याचा छोटासा तुकडा कुसकरून संपूर्ण चेहर्‍यावर लावा. 2-3 मिनिटे चेहरा तसाच ठेवून, नंतर पाण्याने स्वच्छ धुवा.
दर महिन्याला क्लिन अप जरूर करा. या वयोगटासाठी स्किन एक्सपर्ट
स्किन पॉलिशिंगचाही सल्ला देतात. स्किन पॉलिशिंग केल्यामुळे चेहर्‍यावरील मृत पेशी निघून जातात व चेहर्‍याला नवीन लकाकी मिळते. यामुळे त्वचा नितळ व सतेज होऊन, सुरकुत्या व मुरुमे होत नाहीत.
घाम आल्यावर त्वचेवर जोरजोरात घासून पुसू नका. रुमालाने किंवा टिश्यू पेपरने हलकेच पुसून घ्या.

मध्यमवयीन (30 ते 40 वर्षं)
विसाव्या वर्षात त्वचेवर जे तेज असते ते या वयात राहत नाही. त्वचेवर बर्‍याच प्रमाणात सुरकुत्या येतात व तुमचे वय चेहर्‍यावर दिसू लागते. म्हणूनच या वयात त्वचेची योग्य काळजी घेणे सर्वाधिक महत्त्वाचे असते.
चांगल्या दर्जाच्या अ‍ॅण्टि एजिंग क्रीमचा वापर सुरू करा.
स्किन एक्सपर्ट मल्टि व्हिटॅमिन घेण्यास सुरुवात करा, असाही सल्ला देतात.
प्रत्येक महिन्याला फेशियल अवश्य करून घ्या.

उतारवय (40 व त्यापुढे)
या वयात अधिकतर महिलांना मेनोपॉज येतो किंवा त्याची सुरुवात होते. यामुळे त्वचा अधिक कोरडी व रूक्ष होते.
या काळात चेहरा मुलायम ठेवण्यासाठी मॉश्‍चरायझिंगचा वापर अवश्य करावा.
पौष्टिक व संतुलित आहार घ्या. हे केवळ तुमच्या त्वचेसाठीच नाही, तर आरोग्यासाठीही उपयोगी आहे.
या काळात त्वचेसाठी कोणतेही सौम्य उत्पादन वापरा.
चेहर्‍याला स्क्रब करू नका.

काही घरगुती टिप्स
चेहर्‍यावर चमक येण्यासाठी आंघोळीच्या आधी कच्च्या दुधात लिंबाचा रस व मीठ मिसळून त्याने चेहर्‍यास मसाज करा.
मधात थोडी हळद मिसळून चेहर्‍यावर लावा, यामुळे चेहर्‍यावर साठलेली धूळ व मळ निघून जाते.
केळे कुसकरून त्यात एक चमचा दूध मिसळा. हे चेहर्‍यावर लावून 15-20 मिनिटे सुकू द्या. नंतर चेहरा थंड पाण्याने धुऊन घ्या.
एक टेबलस्पून बडीशेप पाण्यात उकळवा. पाणी अर्धे झाले की त्यात एक चमचा मध एकत्र करून याचा लेप चेहर्‍यावर लावा. 10 मिनिटांनी चेहरा धुवा. चेहर्‍यावरील सुरकुत्या दूर होण्यासोबतच, चेहर्‍यावर एक नवा तजेलाही येईल. मधामुळे चेहर्‍यातील ओलावा टिकून राहतो.
कलिंगडाचा गर चेहरा व मानेवर लावा व काही मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा. नियमितपणे असे केल्यास चेहर्‍यावरील डाग नाहीसे होतात.
तुळशीच्या पानांचा रस आणि लिंबाचा रस सम प्रमाणात एकत्र करून चेहर्‍यावर लावा. चेहर्‍यावरील काळे डाग
नाहीसे होतात.

Share this article