Close

मनिषा कोईरालाकडून आई होऊ न शकल्याचं दु:ख व्यक्त; सांगितलं मूल दत्तक न घेण्यामागचं कारण (Heeramandi Star Manisha Koirala Talked About Her Motherhood Dream)

बॉलिवूड अभिनेत्री मनिषा कोईराला सध्या ‘हिरामंडी : द डायमंड बाजार’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. या वेब सीरिजमध्ये मनिषा कोईरालाने मल्लिकाजानची भूमिका साकारली आहे. थोडीशी नकारात्मक छटा असली तरी मनिषाच्या दमदार अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. २०१२ मध्ये मनिषाला गर्भाशयाच्या कर्करोगाचं निदान झालं होतं. त्यावर तिने न्यूयॉर्कमध्ये उपचार घेतले आणि २०१४ मध्ये ती कॅन्सरमुक्त झाली. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी मनिषाने अभिनयक्षेत्रात पुनरागमन केलं आहे.

हिरामंडीच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत मनिषा खऱ्या आयुष्यात आई होण्याच्या इच्छेविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. “मी खऱ्या आयुष्यात आई होऊ शकत नाही, या गोष्टीला मी आता स्वीकारलं आहे आणि त्यातच समाधान मानलं आहे”, असं ती म्हणाली.

मनिषा म्हणाली, “माझ्या आयुष्यात काही ना काही तरी अपूर्ण आहे. तुम्ही जसजसे मोठे होता, तसतसं रिअॅलिटीला स्वीकारता. अशी अनेक स्वप्नं असतात, ज्याबद्दल तुम्हाला अनुभव येतो की, ती कधीच पूर्ण होणार नाहीत. त्यामुळे ती गोष्ट किंवा परिस्थिती तुम्ही आहे तशी स्वीकारता. माझ्यासाठी मातृत्त्व ही गोष्ट त्यापैकीच एक आहे. गर्भाशयाचा कर्करोग आणि त्यानंतर आई न होऊ शकणं या गोष्टींचा स्वीकार करणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. पण आता मी ती परिस्थिती स्विकारली आहे आणि त्यातच समाधान मानलं आहे. जे गेलं ते गेलं. आता माझ्या हातात जे आहे, त्यातून काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करेन.”

या मुलाखतीत मनिषाला मूल दत्तक घेण्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्याविषयी तिने पुढे सांगितलं, “मी मूल दत्तक घेण्याविषयी खूप विचार केला. पण नंतर मला जाणवलं की मी छोट्या छोट्या गोष्टींचा खूप ताण घेते. मला लगेच टेन्शन येतं. त्यामुळे बऱ्याच विचारांती मी मूल दत्तक न घेण्याचा निर्णय घेतला. त्यापेक्षा मी गॉडमदर होईन. माझ्या घरी माझे वृद्ध आईवडील आहेत. त्यांच्यावर मी खूप प्रेम करते. त्यांचा माझ्यावर खूप जीव आहे. त्यामुळे अखेरच्या श्वासापर्यंत मी त्यांच्यासोबत राहीन आणि त्यांची काळजी घेईन. नेपाळला जाऊन मी त्यांच्यासोबत बराच वेळ घालवते. यात मला खूप आनंद मिळतो.”

‘हिरामंडी’ ही सीरिज प्रदर्शित होण्याआधी मनिषाने सोशल मीडियावर पोस्ट लिहित कृतज्ञतेची भावना व्यक्त केली होती. ‘माझ्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांच्याबद्दल मी कृतज्ञ आहे. माझ्या करिअरमध्ये मला उल्लेखनीय भूमिका साकारायला मिळाल्या, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांसोबत काम करण्याची संधी मिळाली आणि अवघड काळात मित्रांनी खूप साथ दिली. देवाच्या कृपेने मला कॅन्सरनंतर जणू दुसरा जन्मच मिळाला आहे. माझ्या आयुष्यात मी काही कठीण प्रसंगही पाहिले आहेत. आता मला वेळेचं महत्त्व खूप जाणवू लागलं आहे’, असं तिने लिहिलं होतं.

Share this article